पैसे दुप्पट करुन देण्याचे आमीष आणि 10 लाखांची लुट
टोळीतील सहा जणांना अटक

-अचलपूरच्या लुटमार प्रकरणात ट्विस्ट
-ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती / 3 जून: जुनी कार खरेदी करण्यासाठी अचलपूर येथे बोलावून चांदूर रेल्वे तालुक्यातील एका व्यक्तीला 10 लाख रुपयांनी लुटण्यात आल्याची तक्रार सदर इसमाने दाखल केल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र काही तासांतच या प्रकरणातील सहा आरोपींना ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळन लाभले आहे. ही लुटमारीची घटना नसून रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार असल्याचे आरोपींच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा येथील रहिवासी सुधाकर राउत (44) याने याबाबत काल सायंकाळी पतरवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नितीन राउत नामक व्यक्तीच्या माध्यमातून जून्या कारचा सौदा करण्यासाठी आपण अचलपूर येथे आलो होतो. त्रिवेणी संगम परिसरात कार दाखविण्याच्या निमित्ताने इर्टिगा वाहनातून आलेल्या चार ते पाच जणांनी आपल्याला मारहाण केली आणि आपल्याजवळची 10 लाखांची रोकड लंपास केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी युद्धपातळीवर आरोपींचा शोध सुरु केला. काही तासांतच ग्रामीण गुन्हे शाखेने या टोळीतील 6 सदस्यांना अटक केली आणि घटनेमागचे सत्य जगासमोर आणले.
याबाबत जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेतून प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. सुधाकर राउत याने आपल्याला लुटण्यात आल्याची खोटी तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून हा तंत्रमंत्राद्वारे रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. सविस्तर माहिती देताना विशाल आनंद यांनी सांगितले की, चांदुर रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा येथील रहिवासी असलेल्या सुधाकर नामदेव राउत याला काही दिवसांपूर्वी त्याच गावात राहणार्या सचिन ठाकरे याने आपण अचलपूरच्या दिलीप राउत याला ओळखतो आणि तो तंत्रमंत्राने रक्कम दुप्पट करुन देत असल्याची बतावणी केली होती.
त्यातून सुधाकर राउत याला आमिष सुटले तो स्वत: अचलपूरला जावून दिलीप राउत याला भेटला व शहानिशा करण्यासाठी विचारणा केली. तेव्हा दिलीप राउत यानेही त्याला तोच दावा केला. तेव्हा आपली रक्कम दुप्पट करुन घेण्याची तयारी सुधाकरने दर्शविली. त्यासाठी दिलीपने सुधाकरला 2 जून रोजी 10 लाख रुपये घेउन अचलपूरला येण्यास सांगितले. ठरल्यानुसार सोमवारी सुधाकर राउत आणि सचिन ठाकरे हे दोघे 10 ऐवजी साढे सहा लाख रुपये घेउन अचलपूर येथे त्रिवेणी संगम परिसरात पोहोचले. तेथे दिलीप राउत हा आपल्या काही साथीदारांसह तवेरा कारसह हजर होता. या सर्वांनी सुधाकर राउत आणि सचिन ठाकरे यांना मारहाण केली आणि त्यांच्याजवळची साढेसहा लाख रुपयांची रोकड हिसकावून कारमधून पळ काढला. त्याची तक्रार सुधाकर राउत याने परतवाडा पोलिस ठाण्यात केली पण त्याने रक्कम दुप्पट करण्याची बाब टाळून वेगळेच कारण सांगितले.
तथापि घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलिसांनी युद्धपातळीवर या आरोपींचा शोध सुरु केला. ग्रामीण गुन्हे शाखेने तपासाची सुत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा ही गंभीर घटना शहापुर वरुड येथील रहिवासी असलेल्या दिगंबर ढोके नामक व्यक्तीने आपल्या साथीदारांसह घडवून आणल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यावरुन पोलिसांनी दिगंबर ढोके याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपणच दिलीप राउत बनून सुधाकर राउतला लुटल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुधाकर राउतकडून लुटलेल्या रकमेपैकी 5.14 लाख रुपये, गुन्ह्यात वापरलेली तवेरा कार व एक दुखाकी तसेच 5 मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलिस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय सचिन पवार, पीएसआय सागर हटवार, नितीन इंगोले, विष्णू राठोड, तसलिम शेख व अन्य पोलिस कर्मचार्यांनी केली.
-नाव बदलवून आखली योजना
या प्रकरणात दिगंबर ढोके हा मुख्य सूत्रधार आहे. त्याने दिलीप राउत नाव धारण करुन सुधाकर राउतला लुटण्याची योजना आखली. रक्कम दुप्पत करुन देण्याची बतावणी करुन त्याने सुधाकरला आपल्या जाळ्यात ओढले आणि सहकार्यांसह योजना अंमलात आणली. दिगंबरच्या अन्य साथीदारांना अटक करण्यात आले आहे. त्यात लाला उर्फ मनोज फुलचंद जयस्वाल (42, फ्रेजरपूरा, अमरावती), निलेश देवकरण यादव (40, राजापेठ), शुभम गोपाल वैराळे (26, राजना पूर्णा, चांदूर बाजार), गोलू उर्फ जयकुमार जगदीश गेडाम (40, प्रबुद्ध मंडळ, फ्रेजरपूरा, अमरावती) यांचा समावेश आहे.