फिनले मिल: कुशल कामगारांच्या जीवनातील वनवास

रोजगाराच्या प्रतीक्षेत अचलपूर फिनले मिल कामगार

अचलपूर /26 मे: कोरोना महामारीला पाच वर्षे पूर्ण झाली, मात्र अचलपूरमधील शेकडो कामगारांचे आयुष्य अजूनही ठप्प आहे. अचलपूरमधील एकमेव रोजगाराचं साधन असलेली ‘फिनले टेक्स्टाईल मिल’ अजूनही बंद असून, या मिलमधील कुशल कामगारांनी आता मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. हातात कौशल्य असूनही या कामगारांना आपले कुटुंब चालविण्यासाठी खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
कोरोना काळात बंद करण्यात आलेली फिनले मिल आजही बंदच आहे. 2021 मध्ये कामगारांनी सलग 3 महिने 11 दिवस आंदोलन केले. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते तत्कालीन कपडा मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यावेळी काही काळासाठी मिल सुरू करण्यात आली होती, मात्र एप्रिल 2021 मध्ये पुन्हा ‘कच्चा माल उपलब्ध नाही’ या कारणावरून ती बंद करण्यात आली.
स्थानिक स्तरावर पुरेशा प्रमाणात कापूस उत्पादन होत असतानाही कच्च्या मालाच्या अभावाचे कारण पुढे करून कामगारांची फसवणूक करण्यात आली आहे. या मुद्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चार वेळा चर्चा झाली, मात्र प्रत्येक वेळी तारीख पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या बाबतीत लक्ष घातले, परंतु ‘23 मिल्स’ प्रकरणाचा हवाला देत फिनले मिल सुरू होऊ शकत नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर नवनीत राणा व रवि राणा यांच्या माध्यमातून वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे.
फिनले मिलमध्ये फिटर विथ जॉबर पदावर कार्यरत असलेल्या विश्वनाथ मधुसुदन गौड यांनी सांगितले की, माझ्या हाताखाली 30 कामगार होते. मी मशीन चालू स्थितीत ठेवण्याचं काम करायचो. पण आज मी ठेकेदारासोबत मोलमजुरी करतोय. पीएफ कटल्यामुळे दुसरीकडे नोकरी करताना अडचणी येत आहेत. कंपनीने अप्रत्यक्षपणे राजीनामा मागितला आहे, मात्र ते दिल्यास आपली वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
वार्निंग मशीन ऑपरेटर म्हणून काम करणारे आकाश रमेशराव जामनेकर म्हणाले, आमचं सहा लोकांचं कुटुंब आहे. माझा लहान भाऊ व मी दोघं कमावते आहोत. एक दिवस काम असतं तर दुसर्‍या दिवशी नाही. छोट्या भावाचं लग्न देखील रखडले आहे. इतक्या कमी उत्पन्नात कुटुंब चालवणं कठीण झालं आहे.
फिनले मिलमध्ये 2016 पासून सायडर मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले ऋषिकेश प्रकाशराव अपाले म्हणाले, काम बंद असल्याने मी सध्या दाल मिलमध्ये हमाली करतो. घरात चार लोक आहेत आणि उत्पन्न नाही. दिवाळीपासून अर्धं वेतन सुद्धा मिळालं नाही. इतक्या वाईट परिस्थितीत काही वेळा आत्महत्येचे विचार मनात येतात.
सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र शासनाकडून फिनले मिलसाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले. मात्र हा निधी अद्यापही मिळालेला नाही. फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी फिनले मिलमधील फिटर राजा ठाकूर यांनी केली आहे.
शेवटी, फिनले मिलमधील कुशल कामगार फक्त एकच मागणी करत आहेत. वेतन नको, पण मिल सुरू करा. त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने जगायची संधी मिळावी.

संबंधित बातम्या

Back to top button