जिल्ह्याला ‘मनरेगा’चा 15 कोटी 28 लाखांचा निधी
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मजुरांना दिलासा

अमरावती /21 मे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात प्राप्त झाला आहे. सदर निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. कामांची मजुरी थकीत असल्याने याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे 63 हजार मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सध्या 4 हजार 843 कामांवर 62 हजार 983 मजूर कार्यरत आहे. निधीच्या कमतरतेमुळे मजुरांना अडचणींचा सामना करावा लागला. मनरेगाची अनेक कामे थांबली होती. आता हा निधी उपलब्ध झाल्याने कामे पुन्हा सुरू होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. उपलब्ध निधीपैकी अचलपूर 57 लाख 43 हजार, अमरावती 83 लाख 57 हजार, अंजनगाव सुर्जी 42 लाख 68 हजार, भातकुली 61 लाख 11 हजार, चांदूर रेल्वे 67 लाख 25 हजार, चांदूर बाजार 1 कोटी 23 लाख 22 हजार, दर्यापूर 69 लाख 33 हजार, धामणगाव 91 लाख, धारणी 24 लाख 93 हजार, मोर्शी 6 कोटी 21 लाख 71 हजार, नांदगाव खंडेश्वर 89 लाख 49 हजार, तिवसा 90 लाख 77 हजार, वरुड 1 कोटी 6 लाख 88 हजार रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. चिखलदरा तालुक्याला याआधीच निधी वितरीत करण्यात आला आहे.
मनरेगाचा निधी मिळालेला नसल्याने मजूरांअभावी असंख्य कामांना विलंब होत होता. तसेच मजुरांची अडचणी होत होती. तीन ते चार महिन्यांपासून मजुरी प्रलंबित असल्याने मजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या निर्देशाने जिल्हाधिकारी यांनी शासनाला थकीत निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला. निधी मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याने जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रूपयांचा निधी 8 मे आणि 19 मे रोजी प्राप्त झाला आहे. सदर रक्कम मजुरांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. जिल्ह्याने आतापर्यंत एकूण 28 कोटी 62 लाख रूपयांची मागणी केली आहे. उर्वरीत 13 कोटी 34 लाख रूपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.