महापालिकेतील 1100 कंत्राटी कामगार संपावर
मनपा आयुक्तांकडून प्रत्येकवेळी आश्वासनावर बोळवण

* पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
* चार महिन्यांपासून पगारापासून वंचित
अमरावती /4 जून: गेल्या चार महिन्यापासून पगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणार्या 1100 कंत्राटी कामगारांनी आज, बुधवार, 4 जूनला दुपारपासून अचानक बेमुदत आंदोलन सुरू केले. जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे गेल्या अनेक दिवसपासून फक्त आश्वासने देत आहेत. अमरावती मनपाच्या विविध विभागात गोविंदा कामगार संस्था व अलिभाई कॉन्ट्रॅक्टर संस्थेचे सुमारे 1100 कंत्राटी कर्मचारी काम करतात. या कर्मचार्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या कंत्राटी कर्मचार्यांनी सांगितले की, त्यांच्या कंत्राटदाराला गेल्या सहा महिन्यांपासून थकबाकी मिळालेली नाही. परंतु त्यांनी कर्मचार्यांना दोन महिन्यांचे पगार दिले आहेत. त्यांना अजूनही चार महिन्यांचे थकीत पेमेंट मिळाले नाही.
त्यांना दरमहा बँकेत पैसेही भरावे लागतात. जेव्हा जेव्हा मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याशी पगाराची चर्चा केली जाते तेव्हा ते फक्त आश्वासने देतात. कंत्राटी कामगारांनी सांगितले की, महानगरपालिकेतील कायम कर्मचार्यांना दरमहा नियमित पगार मिळत आहे. कंत्राटी कामगारांची मागणी आहे की, या कायमस्वरूपी कर्मचार्यांचे वेतन एक महिन्यासाठी रोखून कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात यावे. कोणताही तोडगा न निघाल्याने बुधवारी दुपारी कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले. महापालिकेच्या विविध विभागात काम करणारे हे सर्व कर्मचारी अचानक कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांना अल्टिमेटम दिला. या कंत्राटी कामगारांनी सांगितले की, प्रत्येक वेळी त्यांचा तीन ते चार महिन्यांचा पगार प्रलंबित असतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर कुटुंबाचे पोट कसे भरायचे हा प्रश्न आहे. येत्या काळात शाळा आणि महाविद्यालयेही सुरू होतील, अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कुठून करायचा हाही मोठा प्रश्न आहे. आजपासून सुरू झालेल्या या संपामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे